मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल. (Thackeray govt new rules and regulations for Maharashtra Lockdown)
नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
नवे नियम काय असणार?
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.
नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.