आधुनिक चिकित्सालयाच्या इमारतीचे उद्घाटन
नागपूर: पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ते शेतकर्यांपर्यंत पोचावे. त्याशिवाय ग्रामीण भाग समृध्द आणि संपन्न होणार नाही. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या चिकित्सालयाच्या आधुनिक इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खा.़ डॉ. विकास महात्मे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पातुरकर, सोमकुवर, सुधीर दिवे व अन्य उपस्थित होते. कृषी व ग्रामीण भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढविण्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाचे असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, आधी 85 टक्के भारत हा ग्रामीण भागात वास्तव्याला होता. पण नंतरच्या काळात 30 टक्के तरुणांनी शहराकडे स्थलांतर करणे सुरु केले. कारण ग्रामीण भागात रोजगार नाही, रस्ते, पाणी, खेळण्याची मैदाने नाही. त्यामुळेच आपल्या आर्थिक व्यवस्थेत प्रश्न निर्माण झाले. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी हा 14 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे.
मासेमारी व्यवसायामुळे ग्रामीण भागाचे आर्थिक चित्र पालटू शकते असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आपल्या बोटी समुद्रात फक्त 10 किमीपर्यंतच मासेमारी करतात. पण आपली हद्द 100 नॉटिकल मैलापर्यंत असल्यामुळे तेथपर्यंत मासेमारी केली तर मासेमारांचे उत्पादन वाढेल. तामिळनाडूतील मासेमारांना शासनाने 100 ट्रॉलर (मासेमारी बोट) दिले. या ट्रॉलरच्या माध्यमातून मासेमारी केली, तर आपले उत्पादन 6 ते 7 पट वाढू शकते. विदर्भात साडे सहा हजार मालगुजारी तलाव आहेत. या तलावांवर मासेमारी करून उत्पादन वाढू शकते. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचे उत्पादन वाढविण्यात पशुवैद्यकीय विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या 3 वर्षात दुधाचे उत्पन्न 3 पट करून दाखवावे. हे करीत असताना आर्थिक अंकेक्षणासोबत अधिकारी कर्मचार्यांच्या कामगिरीचे अंकेक्षणही केले जावे. तेही महत्त्वाचे असल्याचे ना. गडकरी म्हणाले.
रस्ते व महामार्गांची कामे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लागणार्या मातीसाठी आम्ही तलाव करून देऊ. बोरगाव मंजूजवळ असाच तलाव प्राधिकरणाने करून दिला. आज त्या तलावात पाणी जमा झाले आहे. विदर्भात मालगुजारी तलावाच्या माध्यमातून गोड्या पाण्यातील झिंग्यांचे उत्पादनही वाढू शकते व त्यामुळे आपले उत्पादन डॉलरमध्ये जाऊ शकते. नवीन तंत्रज्ञान, संशोधन यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढवून आपण आत्मनिर्भरकडे गेले पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.