महावितरणच्या कृषी योजनेत ६३ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
प्रजासत्ताकदिनी योजनेची माहिती देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आवाहन
गावाच्या विकासाठी नागपूर जिल्ह्याला ३० कोटीचा निधी
नागपूर : महावितरणच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण-२०२० चा नागपूर व वर्धा जिल्ह्याचा समावेश असलेल्या नागपूर परिमंडलातील ६३ हजार ३३६ ग्राहकांनी लाभ घेतला असून त्यापैकी १८ हजार २८१ ग्राहक थकबाकीची अर्धे पैसे भरून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेतून २ हजार ९५७ नवीन कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून योजनेत जमा झालेल्या एकूण ५८ कोटी रुपयांतून गावात वीज विषयक विकास कामे केली जाणार आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्याला ३० कोटी रुपये विकासकामांसाठी मिळणार आहेत. योजनेच्या प्रभावी अमंलबजवणीसाठी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकप्रतिनिधींना पत्राद्वारे केले आहे.
कृषी पंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत ३० मीटर च्या आत सर्व कृषी ग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येत असून ३० पेक्षा अधिक व २०० मीटरच्या आत अशा ग्राहकांना एरियल बंच द्वारे,२०० ते ६०० मीटर पर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे तर ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना सौर ऊर्जा अथवा उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यात येत आहे.
योजनेत वीज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना भरघोस सवलत देण्यात येत आहे. योजना सुरु झाल्यापासून (सप्टेंबर २०२०) ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ करण्यात आला आहे. तसेच मागील ५ वर्षाच्या थकबाकीवरील संपूर्ण विलंब आकार माफ व व्याजदरात सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या प्रथम वर्षी (सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२) कृषी ग्राहकांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के रकमेची सवलत ग्राहकांना देण्यात येते व ते १०० टक्के थकबाकीमुक्त होतात. योजनेच्या दुसऱ्या वर्षी ( एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ ) ही सवलत ३० टक्के तर योजनेच्या तिसऱ्या वर्षी (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ ) मध्ये कृषी ग्राहकाने भरलेल्या रकमेवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच योजनेत सहभागासाठी सप्टेंबर २०२० पासून त्यांचे चालू वीज देयक भरणे क्रमप्राप्त आहे.जर कृषी ग्राहकाने प्रथम वर्षात म्हणजेच ३१ मार्च २०२२ पर्यंत योजनेचा संपूर्ण लाभ घेतल्यास एकूण ६६ टक्के पर्यंत सवलत प्राप्त होऊ शकते.
या योजनेत नागपूर जिल्ह्यात एकूण १६२४ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेचा ३६ हजार ५३१ ग्राहकांनी लाभ घेतला असून त्यांनी ३९.९६ कोटींचा भरणा करून सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी १० हजार ७०० ग्राहक रुपये १८.३९ कोटी भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात १ हजार ३२३ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेचा २६ हजार ८०५ ग्राहकांनी १८.८७ कोटींचा भरणा करून सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी ७ हजार ५८१ ग्राहक रुपये ८.८१ कोटी भरून थकबाकीमुक्त झाले आहेत.
योजनेत शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशातून कृषी आकस्मिक निधीतून नवीन उपकेंद्रे,उपकेंद्रे क्षमता वाढ,नवीन रोहित्रे,रोहित्रांची क्षमता वाढ,लघु वाहिनी व उच्चदाब वाहिनी या कामांचा समावेश असून योजनेतून नागपूर जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर ३०.९ कोटी उपलब्ध झाले आहे. या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात ७०५ कामांचा कार्यादेश देण्यात आला असून ६७ कामे पूर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत. या योजने अंतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर १३.३२ कोटी उपलब्ध झाले असून योजने अंतर्गत ४२० कामांचा कार्यादेश देण्यात आला आहे व कामे प्रगतीपथावर आहेत.