कुशीनगर: येथे एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये तपास करण्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहेत. हा तरुण भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत असल्याचा दावा केला जात असल्यामुळेच त्याची हत्या झाल्याची चर्चा आहे.
म्हणूनच या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. १० मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बाबरने मिठाई वाटली होती. यावेळेस त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला भाजपला पाठिंबा देऊ नकोस, असा इशारा दिल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. बाबरच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे शेजारी हे बाबर भाजपसाठी प्रचार करतो म्हणून त्याच्यावर नाराज होते.
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यामधील २५ वर्षीय बाबर अली या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला. त्याच्या शेजाऱ्यांनी बाबरला भाजपच्या प्रचारामध्ये तसेच विजयानंतरच्या विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबरचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी म्हटले आहे.
![](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2024/08/400x400px-Nagpur-Today-Web-Page-1.jpg)
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यासंदर्भातील ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले आहे. या प्रकरणासंदर्भात योगी आदित्यनाथ नक्की काय म्हणाले आहेत आणि त्यांनी काय आदेश दिले आहेत, हे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. कुशीनगर येथील कठघरही गावातील बाबर या तरुणाचा लोकांनी मारहाण केल्यानंतर मृत्यू झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या तरुणाच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असून त्यांनी तसे आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
२० मार्च रोजी बाबरला मारहाण करण्यात आली होती. त्याचा उपचारादरम्यान लखनऊमधील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. बाबरचा मृतदेह रविवारी त्याच्या गावी नेण्यात आला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. दोषींवर कारवाई करा, मगच आम्ही अत्यंस्कार करु, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.