नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले.
आधी ते म्हणाले, २००० च्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणत आहेत, २००० ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल. यासाठी आम्ही म्हणतो की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एक अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगते. त्याला काहीही समजत नाही. मात्र त्रास तर जनतेला सहन करावा लागतो, अशा शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश टीका करत म्हणाले की, विश्वगुरूंची स्वतःचीच एक शैली आहे. आधी कृती, मग विचार. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी एकाकी आणि विनाशकारी निर्णय घेत जुन्या नोटा बाद करून तुघलकी फर्मान काढण्यात आले. मोठा गाजावाजा करीत २००० ची नोट काढली, मात्र आज तीही मागे घेण्यात आली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम म्हणाले, “अपेक्षेप्रमाणे सरकारने किंवा आरबीआयने २००० रुपयांची नोट मागे घेतली आहे. आता सरकारने / आरबीआयने १००० ची नोट पुन्हा बाजारात आणली तर आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान भाजपा नेत्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.