मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्यानंतर ते सत्ताधारी भाजपा-शिंदे गटात सामील झाले. यामुळे राज्यातील विरोधी पक्ष नेते पद रिक्त झाले आहे. हे पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेत आता काँग्रेसचे संख्याबळ शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल . यापार्श्वभूमीवर काँग्रेसची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही पक्षाची रणनीती ठरविण्यात येईल.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार विरोधी पक्षनेते होते. कारण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे सर्वाधिक जागा होत्या. परंतु, आता अजित पवारच आपल्या काही समर्थक आमदारांसोबत जाऊन बसल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. तात्पुरते हे पद राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांना देण्यात आले आहे. परंतु, अजित पवारांसह अनेक आमदार गेल्याने विधानसभेतील शरद पवार गटाचे संख्याबळ कमी झाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे संख्याबळही कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचेच आमदार आता सर्वाधिक आहेत.
हे पाहता ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांनाच विरोधी पक्षनेते पद या सूत्रानुसार हे पद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दावा केला असून महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षाशी चर्चा करून विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतला जाईल , असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.