नागपूर : स्थानिक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील विविध समस्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर घोषणा दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
शहरात काही भागात पाणी पुरवठा नियमित होत नाही. नियमितपणे शहरातील रस्ते, गल्ल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. त्यामुळे कित्येक दिवस रस्त्यांच्या बाजूला असलेले दिवे बंद असतात. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारापासून आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढला. आयुक्त कार्यालयावर जोरदार घोषणाही दिल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये आशीष दिक्षीत, लंकेश ऊके, राज खत्री, रिजवान रुमवी, नयन तरडकर यांच्या समावेश आहे.
नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अमृत योजनेतंर्गत जलवाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र या कामादरम्यान काढण्यात आलेला मलबा अद्यापही रस्त्याच्या कडेला पडून आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.