अमरावती : समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जीव गेले. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अपघातानंतर परिवहन खात्याने केलेल्या पाहणीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
१ जुलैला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. याचा फ़ॉरेन्सिक अहवाल समोर आला असून धक्कादायक बाब समोर आली आहे.
अपघाताच्या वेळी बसचा चालक हा मद्यधूंद अवस्थेत असल्याचे तपासातून उघड झाले आहे. बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये ०.०३ टक्के म्हणजे १०० मिलीलीटर रक्तात ३० मिलीग्रॅम अल्कोहोल आढळून आल्याचे अमरावती येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटले.
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस (एमएच 29, बीई 1819) नागपूर पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही बस पिंपळखुटा गावाजवळ बसचा भीषण अपघात झाला.अपघातग्रस्त बसचा चालक शेख दानिश याने खिडकीतून उडी मारत स्वतःचा जीव वाचविला. शेख दानिश याला पोलिसांनी अटक केली आहे. शेख दानिश याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
रासायनिक विश्लेषण अहवालानुसार अपघाताच्या वेळी त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा जास्त होती. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने विक्रमी वेळेत २५ पैकी २३ मृतदेहाची डीएनए चाचणी पूर्ण केली असून दोन मृतदेहांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. संपूर्ण अहवाल पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे नागपूर आणि अमरावती येथील उपसंचालक डॉ. विजय ठाकरे यांनी दिली.