मुंबई : राज्याच्या राजकारणात २ जुलैला मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. राष्ट्र्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवारांनी बुधवारी जे भाषण केले त्यात शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी कुठल्या वयात थांबलं पाहिजे हे तुम्ही का सांगत आहात? मी निर्णय घेऊ शकतो, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावले.
मी का निवृत्त व्हायचं? मी काम करु शकतो, काम करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. त्यावेळी संपूर्ण पक्षाने मला सांगितलं की तुम्ही निवृत्त होऊ नका. तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये लोक रडू लागले आणि सांगू लागले की तुम्ही निवृत्त व्हायचं नाही. मी लोकभावनेचा आदर केला आणि राजीनामा मागे घेतला. आज मला कुणी का म्हणत आहेत की निवृत्त व्हा? मी लोकांमध्ये जातो आहे, त्यांचे प्रश्न मांडतो आहे यात चुकीचं काय? मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यात वेगळी अशी काय जबाबदारी आहे? मी संघटनेचा प्रमुख आहे आणि संघटनेसाठी काम करतो , असेही शरद पवार म्हणाले.
मोरारजी देसाई कुठल्या वयात पंतप्रधान झाले होते देशाला माहित आहे. मला पंतप्रधान व्हायचं नाही, मंत्री व्हायचं नाही. संघटनेत काम करायचे आहे. त्यासाठी वयाचा प्रश्नच येत नाही. मी टायर्डही नाही रिटायर्डही नाही. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी नवं नेतृत्व तयार करायचे आहे त्यासाठी मेहनत घेतो , असेही पवार म्हणाले. नवी पिढी तयार करणं हेच आमचं लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले. जे लोक गेले त्याचं मला वाईट वाटलं पण हा माझ्यासाठी झटका वगैरे नाही. कारण राजकारणातील या घडामोडींना मी तोंड दिले आहे. पक्षाला पुन्हा उभारणी देण्यासाठी मी तयार असल्याचे पवार म्हणाले.