नागपूर : भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी ऐतिहासिक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या अर्थव्यस्थेने 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून लवकरच देश आर्थिक महासत्ता होण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा साध्य राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही. मात्र असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन केंद्रीय मंत्री आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी या वृत्ताचे स्वागत केले.
याबाबत ‘एक्स’वर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. काल दुपारी 2:45 ते 6:45 दरम्यान, जेव्हा देश क्रिकेटचा सामना पाहण्यात गुंग झाला होता, तेव्हा मोदी सरकारच्या विविध नेत्यांनी भारताच्या अर्थव्यस्थेने 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला अशी माहिती पसरवली. तसेच मोदी सरकारचे कौतुक केले. मात्र हे वृत्त खोटे आहे. ही पूर्णपणेबोगस बातमी होती. ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये अधिक उत्साह निर्माण करणे इतकाच आहे.हा सरकारचा बेफिकीरपणा आणि हेडलाइन व्यवस्थापन दोन्हीसाठी एक दयनीय प्रयत्न असल्याचे जयराम रमेश पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
संदेश प्रसारित करणाऱ्यांत जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचा समावेश आहे. तर प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांनी, ‘‘भारताचे अभिनंदन. चार हजार ४०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेला जपान आणि चार हजार ३०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीस मागे टाकून, जीडीपीत भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्यासाठी आता फक्त दोन वर्षे उरली आहेत,’ असा संदेश प्रसारित केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, जीडीपीने ‘चार ट्रिलियन’चा टप्पा ओलांडल्याचा क्षण जागतिक स्तरावरील सन्मानाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय अतुलनीय आहे,’ असे म्हटले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर चर्चा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कथित आकडेवारीवर आधारित सर्व देशांच्या नव्या ‘जीडीपी’च्या आकडेवारीचा अनधिकृत ‘स्क्रीनशॉट’ समाजमाध्यमांवर प्रसृत झाला आहे. तो प्रसृत करण्यात सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेकांचा समावेश आहे.