छत्रपती संभाजीनगर – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत चालला आहे.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.
मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे. सरकार धरसोड करत आहे. सरकार आरक्षण देईल वाटत नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही.
मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा असून सरकारने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.