नागपूर :काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरातील बहादुरा येथील मैदानावर ‘है तैयार हम’ महारॅली आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
भाजपची विचारधारा ही राजेशाहीची आहे.तर काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांचे हित जोपासणारी आहे. देशाची सूत्रे जनतेच्या हाती असावीत. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.
स्वातंत्र्यापूर्वी सामान्य, गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा दिला आहे. केंद्र सरकार स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात पुन्हा देशाला नेऊ पाहत आहे.मात्र या नव्या गुलामगिरीविरोधातही काँग्रेस लढेल आणि जिंकेल, असा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, गटनेेते बाळासाहेब थोेरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेते उपस्थित होते. या रॅलीच्या निमित्ताने काँग्रेसने आगामी निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.