मुंबई राज्यासह देशभरात नीट पेपर फुटीवरून गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आज विधानसभेत याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी आम्ही आंदोलन केले, उपोषण केले आहे. महाराष्ट्र राज्य पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात काढणार का? सार्वजनिक भरतीचे पेपर फुटले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आणला त्याचे स्वागत आहे. त्यातही काही त्रुटी आहेत. या अधिवेशनात पेपर फुटीचा कायदा आणला जावा. हा युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. आम्ही चुकीचे काही बोलत नाही. गृहमंत्री बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती अपुरी आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
रोहित पवारांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तलाठी भरतीबाबत जो काही गोंधळ झाला, त्याच पेपरात चूका होता. कुठलीही गोष्ट लपवण्याचं कारण नाही. १ लाख लोकांना नियुक्ती देताना राज्य सरकारने पारदर्शक काम केलं आहे. काही ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला, तो प्रय़त्न हाणून पाडला. पेपर फुटीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचे आहे. राज्यानं १ लाख नियुक्त्या कमी वेळात दिल्या.
पेपर फुटीचा केंद सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने हा कायदा तयार करावा यासाठी मागच्या अधिवेशनातच निर्णय घेतला आहे. सध्या यावर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.