नागपूर : शहरातील रामझुल्यावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत दोन तरुणांना चिरडणाऱ्या रीतिका ऊर्फ रितू मालूने समोवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण होते.यानंतर काल तहसील पोलिसांनी मालूला न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी मालूच्या पीसीआरची मागणी केली.
याला मालूच्या वकिलाने विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मालूची अटक बेकायदेशीर ठरवत पीसीआरची मागणी फेटाळून लावली. यासह न्यायालयाने मालूला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाचा हा निर्णय नागपूर पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तहसील पोलीस वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
न्यायालयाने का केला पीसीआर रद्द-
मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळल्यानंतर तिला अटक होणार हे निश्चित झाले होते. मात्र कनिष्ठ न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आरोपी रितिका मालूला अटक करण्यापूर्वी संबंधित न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. पोलिसानी ती प्रक्रियाच केली नाही. तांत्रिक नियमांचा फायदा मालूला मिळाल्याने न्यायालयाने तिला सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले.
दरम्यान रामझुल्यावर 25 फेब्रुवारी रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत रितिका मालूने दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोमीनपुरा येथील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34) आणि जाफर नगर येथील मोहम्मद आतिफ (32) यांचा मृत्यू झाला.