Published On : Mon, Sep 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सरकार हे ‘विष्कन्या’सारखे…;नितीन गडकरींच्या विधानामागचे कारण काय ?

Advertisement

नागपूर : नागपूर येथे झालेल्या विदर्भ आर्थिक विकास परिषदेच्या ‘अमेझिंग विदर्भ परिषद’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही धक्कादायक विधाने केली आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही, असे सांगून उद्योगपतींनी सरकारवर अवलंबून राहू नये.सरकार हे ‘विष्कन्ये’सारखे आहे. जे कोणाशीही संबंध ठेवेल त्याचे नुकसान करू शकते, असेही गडकरी म्हणाले.

उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या योजना आणि व्यवसायाचे निर्णय पूर्णपणे सरकारच्या मदतीवर किंवा अनुदानावर अवलंबून न ठेवण्याचे आवाहनही गडकरी यांनी केले. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या, पण कधी मिळेल याची शाश्वती नाही. सबसिडी केव्हा आणि किती प्रमाणात मिळेल हे अनिश्चित असल्यामुळे एखाद्याला सबसिडीसाठी “देवाची प्रार्थना” करावी लागेल, असेही त्यांनी गमतीने सांगितले.

Today’s Rate
Monday 30 Sept. 2024
Gold 24 KT 75,900/-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 91,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनुदानाची अनिश्चितता-
गडकरींनी आपल्या मुलासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले की, त्यांच्या मुलाने 450 कोटी रुपयांच्या अनुदानाची आशा व्यक्त केली होती, परंतु त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे असू शकते, असा इशारा गडकरींनी दिला. इतर अनेक योजनांमध्ये सरकारचे प्राधान्यक्रम बदलू शकतात, ज्यामुळे अनुदानास विलंब होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. उदाहरण म्हणून त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’चा उल्लेख केला.

Advertisement

विदर्भात गुंतवणुकीअभावी चिंता-
विदर्भात मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार नसल्याबद्दलही गडकरींनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, 500 कोटी किंवा 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकणारे उद्योगपती येथे उपलब्ध नाहीत, त्यामुळे मोठे प्रकल्प या भागात येत नाहीत. विदर्भातील काही प्रकल्प बंद पडले असून काही युनिट सुरू होऊ शकलेले नाहीत, तर बुटीबोरीसारख्या भागात जमिनींचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक लोक जमीन खरेदी करून विकतात, पण नवीन उद्योग उभारण्यात रस दाखवत नाहीत.

तर रोजगार वाढेल-
नागपूरचा आर्थिक विकास झाला तर नागरिकांची क्रयशक्ती वाढेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘विदर्भात ताडोबा, पेंच, कन्हांडलासारखे व्याघ्रप्रकल्प आहेत. शेगाव, आंभोरा, धापेवाडा, माहूरसारखी तीर्थक्षेत्रे आहेत. बाहेरचे पर्यटक नागपुरातून याठिकाणी जातात. त्यांच्यासाठी नागपूर हे जंक्शन आहे. पण ते इथे थांबत नाहीत. बाहेरच्या पर्यटकांना नागपुरात थांबविण्यासाठी निमित्त द्यावं लागेल. गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला तर नागपूरसह संपूर्ण विदर्भात पर्यटन विकासाच्या संधी निर्माण होतील, असेही गडकरी म्हणाले.

एमजी हेक्टर कंपनी आणि इलेक्ट्रिक वाहनांची चर्चा-
गडकरींनी सज्जन जिंदाल यांचे उदाहरण देऊन सांगितले की, त्यांनी अलीकडेच एमजी हेक्टर कंपनी घेतली असून इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी जिंदाल यांना नागपुरात विशेषत: इलेक्ट्रिक बस आणि ट्रक बनवण्यासाठी काहीतरी नवीन सुरू करण्याचे आवाहन केले. विदर्भात असे मोठे उद्योग उभारल्यास या भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकेल, असा विश्वास गडकरींना वाटतो.

दरम्यान नितीन गडकरींच्या या विधानातून उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा संदेश तर मिळतोच, पण सरकारवर जास्त अवलंबून राहण्याची गरजही यातून दिसून येते. गडकरींचा हा दृष्टिकोन स्पष्ट करतो की उद्योग आणि व्यवसायांनी त्यांच्या योजना स्वतंत्रपणे कराव्यात आणि केवळ अनुदानावर किंवा सरकारी मदतीवर अवलंबून राहू नये. विदर्भात मोठ्या गुंतवणुकीचा अभाव असतानाही योग्य दिशेने काम झाल्यास हा प्रदेशही आर्थिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.