
Oplus_16908288
नागपूर:महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे.औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8.30 वाजता नागपूरमधील महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाचा पुतळा जाळला होता, त्यानंतर हिंसाचार उसळला.पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला, ज्यात अनेकजण जखमी झाले, तर अनेक वाहने जाळण्यात आली. दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कालच्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन,80 जणांना अटक –
महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.
नागपूरमधील ‘ या’ भागात संचारबंदी-
नागपुरातील गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी कोणीही घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त सिंगल यांनी पत्रक केले जारी –
नागपूरमधील घटनेच्या अनुषंगाने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी एक पत्रक जारी केले.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (1) (2) (3) प्रमाणे नागपूरच्या काही परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू केला.
नागपुर शहरातील परिमंडळ क्रमांक 3 हद्दीतील पोलीस ठाणे कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर या भागास तसेच परिमंडळ 4 मधील सक्कदरा, नंदनवन, इमामवाडा या भागात व परिमंडळ 5 मधील यशोधरानगर, कपीलनगर, या परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करीत आहे. संचारबंदी कालावधीमध्ये कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळून इतर कारणाकरीत घराबाहेर पडणार नाही तसेच 5 पेक्षा जास्त इसम एकत्रीत जमणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारीत करणार नाही,असे आदेश सिंगल यांनी दिले आहे.