File Pic
मुंबई:लाखोंचे मोर्चे कोणतीही अनुचीत घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणा-या मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, हे अतिशय संतापजनक आहे अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज काकासाहेब शिंदे या तरूणाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखद आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि आतापर्यंत अवलंबलेला शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोडू नये असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, वारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणा-यांच्यांच डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. शेतक-यांनी मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला.
एल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या ख-या सूत्रधारांना सोडून आंदोलन करणा-या दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड करण्यात आली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
वारकरी संप्रदाय आणि संतांचा अवमान करणा-या मनोहर भिडे यांचे वक्तव्य अजूनही तपासता न आलेल्या सरकारला पंढरपूरच्या वारीमध्ये घातपात घडवला जाणार आहे असा कथित रिपोर्ट मात्र तात्काळ मिळतो हे अचंबीत करणारे आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य हिब्रू भाषेत होते का? ज्यामुळे तपासायला एवढा वेळ लागतो आहे असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी केला.
मनुवादी भिडेला पाठीशी घालून आंदोलक कार्यकर्त्यांना त्यांच्या शिवाजी महाराजांवरील प्रेमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही. शिवरायांच्या मावळ्यांपैकी अनेकांचे आई बाप वारीत आहेत त्यांना दूषण देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे स्पष्ट करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.