मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवले आहे. तसेच राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला.
आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांनी अजित पवार गटातील आमदारांविरोधात शरद पवार गटाने केलेली अपात्रतेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील ४१ आमदार हे पात्र ठरले आहेत. यावेळी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत, तर अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरल्याने हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान राष्ट्रावादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रमाणेच लागला आहे.
नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. तसेच अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.