नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजापने महाराष्ट्राचे नुकसान केले, असा घणाघात नागपुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार,प्रफुल्ल पटेलसारख्या बड्या नेत्यांनी पवारांची साथ सोडली. यात प्रफुल्ल पटेल यांची पक्षात घुसमट होत होती असा आरोप होत होता. यावर पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे.
त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही. पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होते, असे सुळे म्हणाल्या. दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठं नुकसान होत असल्याची टीकाही सुळे यांनी केली.