नागपूर: नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण रविवारी (ता. २०) माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊसमध्ये करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. रमेश धुमाळ व बोधचिन्हाचे रचनाकार श्री. विवेक रानडे उपस्थित होते.
नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत ‘पौर जन हिताय’ हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या
नागपूर महापालिकेची स्थापना २ मार्च १९५१ रोजी झाली होती. त्यावेळी शासनाने प्रशासक म्हणून श्री.जी.जी. देसाई यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनात जून १९५२ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपूर नगरीचे दोनदा महापौर राहिले आहेत. तसेच विद्यमान आमदार श्री. कृष्णा खोपडे, श्री. प्रवीण दटके, श्री. विकास ठाकरे, श्री. संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर राहिलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत ५४ महापौर, ५६ उपमहापौर आणि ५० आयुक्तांची सेवा नागपूर महानगरपालिकेला लाभली आहे. महाराष्ट्रात नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी सी.एन.सी. ॲक्ट १९४८ अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करणारे श्री.जे.एस. सहारिया आणि श्री. मनू कुमार श्रीवास्तव यांना राज्याचे मुख्य सचिव पदावर काम करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच इतर आयुक्त म्हणून काम केलेले अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत.