स्वच्छता निरीक्षकांसाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रशिक्षण कार्यशाळा
नागपूर: तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्याने नक्कीच परिवर्तन घडवून येईल व स्वच्छ भारत अभियानाचे लक्ष पूर्ण होईल. व्यवस्थापनाच्या संकल्पना आता जागतिक स्तरावर एकसारख्या पद्धतीने बदलत आहेत आणि आपल्याला सुद्धा जागतिक ज्ञान आता सहज उपलब्ध आहे त्यामुळे आधुनिक पद्धतीचे सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आता शक्य आहे.
तंत्रज्ञानाच्या बरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि आमचे सर्व स्वच्छता कर्मचारी यांचा या कामांमध्ये असलेला प्रभावी सहभाग. कामांचे नीट विभाजन करून स्वच्छता विभागातील थोडे अधिक शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देऊन मनुष्यबळाच्या कमीवर मात करता येईल, असे प्रतिपादन वाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी प्रशिक्षणाच्या उद्घाटन पर मार्गदर्शनात केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नागपूर यांच्या वतीने नागपूर व अमरावती विभागातील नगरपालिकांच्या स्वच्छता निरीक्षकाची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. देशमुख म्हणाले, स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या या जनआंदोलनाचा केंद्रबिंदू स्वच्छता निरीक्षक हाच असतो त्यामुळे शहरांचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते.
जागतिक स्पर्धेमध्ये शहरांना विकासाचे इंजिन बनविण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाने आपल्याला एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे तिचा नक्कीच फायदा आपण सगळे घेऊ, असा विश्वास विजय देशमुख यांनी व्यक्त केला.
काळाच्या ओघात शहरांमध्ये कचरा निर्माण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी 3 R ही कचरा व्यवस्थापनातील संकल्पना अतिशय उपयोगाची आहे.
आजपासून बारा वर्षांपूर्वी जपान मध्ये २० प्रकारांमध्ये कचऱ्याचे विलगीकरण केले जात होते. आपण आता किमान नियमांमध्ये सांगितल्याप्रमाणे घरगुती कचऱ्याला तीन भागांमध्ये विभाजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही विजय देशमुख म्हणाले.
स्वच्छ भारत अभियान अर्बन 2 च्या मार्गदर्शक सूचना, स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या मार्गदर्शिका आणि स्वच्छेतेचे सहा नियम या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हे सर्व विषय विदर्भातील सुदूर नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना व शहर समन्वयकांना अत्यंत उपयोगी होते.
पाहिले सत्र जयंत पाठक यांनी स्वच्छ भारत अभियान अर्बन 2 च्या मार्गदर्शक सूचना या विषयावर घेतले, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या संचालिका लीना बुधे यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या मार्गदर्शिका समजावून सांगितल्या. ऐश्वर्या देशमुख यांनी स्वच्छतेचे सहा नियम मांडले. नागपूर महानगरपालिकेचे स्वच्छता विभागातील अधिकारी अनित कोल्हे यांनी स्वच्छ सर्वेक्षण पोर्टलबद्दल सर्वांना माहिती दिली.
कार्यशाळेचा समारोप अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे च्या अर्बन अपडेट या मासिकाचे कार्यकारी संपादक तथा दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकारअशोक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आता नगर विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहे. पण शिक्षण आणि प्रशिक्षण हे संस्थेचे मूळ काम आहे त्यामुळे अशा प्रशिक्षणाचे अतिशय महत्त्व आहे. प्रत्यक्ष कार्य करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना अद्यायावत होत राहणे गरजेचे असते म्हणून या अशा प्रशिक्षणाची सतत गरज असते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत जयंत पाठक यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन डॉ. मंजिरी जावडेकर यांनी केले. कार्यशाळेत 30 नागरपालिकेतून 62 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात बदलापूर, डहाणू, कंधार, भामरागड, अहेरी, नांदुरा, जळगाव जामोद, अचलपूर अशा सुदूर भागातून प्रतिनिधी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.