आदिवासी विकास विभागाचा आढावा
वर्धा,:- आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
वर्धा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी आज अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागातील आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे अमरावतीचे उपायुक्त नितीन तायडे, नागपूर उपायुक्त दीपक हेडाऊ, वर्धा प्रकल्प अधिकारी डीगंबर चव्हाण, उपवन संरक्षक सुनील शर्मा उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना 2019 -20 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या योजना आणि झालेला खर्चाबाबत प्रत्येक विभागाचा आढावा घेतला.
2019 -20 या वर्षात मंजूर नियतव्यय 40 कोटी रुपये होता त्यापैकी 97 टक्के खर्च झालेला आहे 2020 -21 साठी 33 टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निधीचा उपयोग आदिवासी युवकांना रोजगार निर्मितीसाठी करण्यात यावा. प्रत्येक विभागाने त्यानुसार नियोजन करावे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास यात नाविन्यपूर्ण योजना राबवावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर आणि अमरावती विभागाचाही ठाणी आढावा घेतला.
याबैठकीला कृषी, पशुसंवर्धन,विज वितरण, शिक्षण विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.