– गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. यातच भाजपचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.मात्र त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची डोकेदुखी वाढत असल्याची चर्चा आहे. हे पाहता आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कट होणार ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
गेल्या चाळीस वर्षातून महाराष्ट्राच्या राजकारणात पाच वर्ष मुख्यमंत्री पदी राहण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांचे गृहस्थान असलेल्या नागपुरातून केली. त्यावेळी उपराजधानीत भाजपाची सर्व जबाबदारी नितीन गडकरी यांच्या खांद्यावर होती.
गडकरी यांना गुरु मानून फडणवीस हे राजकीय मैदानात उतरले. मात्र कालांतराने फडणवीस यांनी गडकरी यांचे बोट सोडून त्यांचे पक्षातीलच विरोधक असलेले गोपीनाथ मुंडे यांच्याकडे रोख केला. यानंतर २०१३ मध्ये फडणवीसांच्या पदरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद पडले. त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा मोठा पक्ष बनला. मात्र हेच त्यांच्यासाठी संकटाचे ठरत गेले आणि भाजपमध्येच त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्यासमोर उभे राहिले. यात नितीन गडकरी, पंकजा मुंडे , भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ शिंदे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचं पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जातात. यांत गडकरी यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांनी राज्याच्या राजकारणातून काढता पाय घेतला. आपल्या प्रतिस्पर्धी नेत्यांना पाडण्यासाठी फडणवीसांनी पक्षातील इतर नेत्यांना बाल देण्यास सुरुवात केली. त्यांनी खडसे यांच्याविरोधात गिरीश महाजन यांना उभे केले. तर पंकजा मुंडे यांच्याविरोधात आशिष शेलार यांना बळ दिले.
देवेंद्र फडणवीसांची एक खासियत म्हणजे त्यांची गुप्तचर यंत्रणा अधिकच मजबूत आहे. यामाध्यमातून ते त्यांच्याविरोधातील सर्व डाव मोडतात . त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतेच असे व्यापक आंदोलन झालेले नाही.
फडणवीसांनी राज्यात स्वतःची ताकद उभी केली असून राज्यात एकाहती वर्चस्वही गाजवले. सध्याच्या स्थितीही त्यांनी मोठी खेळी खेळत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र आगामी निवडणुकीसाठी भाजपचे हायकमांड मुख्यमंत्री पदासाठी एकच चेहरा कायम ठेवू शकत नाही. मात्र फडणवीसांची वाढती ताकद मोदी- शहांची डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे हायकमांड वेळीच फडणवीसांचे पंख छाटणार अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. याचेच उदाहरण म्हणजे शिंदे- भाजप युतीत ऐनवेळेवर फडणवीसांना मिळालेले उपमुख्यमंत्री पद आहे.
काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसने विलासराव देशमुख यांना पर्यायी चेहरा म्हणून नारायण राणे यांना उभे केले होते. तर नारायण राणे यांना पर्यायी चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि त्यांचा पर्यायी चेहरा म्हणून अशोक चव्हाण असा पॅटर्न राबविला होता. तसाच पॅटर्न आता भाजपकडून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत सापडले आहे. यातच विनोद तावडे यांच्याकडे पहिले तर ते भाजपचे सरचिटणिस आहेत. मोदी -शहांनी त्यांना मोठी जबाबदरी दिली आहे. त्या जबाबदारीला तावडे यांनी चांगल्या तऱ्हेने स्वीकारली असून त्यांनी मोदी-शहा यांचा विश्वसही जिंकला आहे. तसेच भाजपने २०२४ च्या निवडणुकीसाठी विशेष समिती तयार केली त्याची जबाबदारीही तावडे यांना देण्यात आली आहे. हे पाहता मोदी -शहा २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कट करून विनोद तावडे यांना मुख्यमंत्री पद देऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.