नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर भाजपनं आज राज्यभर आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली. आंदोलकांसमोर बोलताना फडणवीस यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत माहीत आहे का, असं म्हणत, फडणवीस यांनी दोन नावंही सांगितली.
नागपूर येथील व्हरायटी चौकात जमलेल्या आंदोलकांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. ‘ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळलं पाहिजे. वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका केली होती, असं फडणवीस म्हणाले. ‘हे दोघेही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांचं येणंजाणं असतं. तिथं त्यांना मान सन्मान दिला जातो. त्यांनीच ही याचिका दाखल केली आहे. या दोघांच्या याचिकेमुळंच ओबीसी आरक्षणाचं प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. त्यावेळी आमचं सरकार होतं. मी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे यांना एकत्र बसवून चर्चा केली. हे मोठा कारस्थान असून ते हाणून पाडलं पाहिजे, असा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे सरकारच्या वतीनं न्यायालयीन लढाई लढले आणि नागपूर उच्च न्यायालयानं सरकारच्या बाजूनं निर्णय दिला,’ असं फडणवीस म्हणाले.
‘ओबीसींचं आरक्षण रद्द होऊ शकत नाही असं न्यायालयानं त्यावेळी सांगितलं. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असेल तरीही रद्द होऊ शकत नाही. या निर्णयाच्या विरोधात हेच लोक नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर आरक्षण धोक्यात आलं,’ असा दावा फडणवीस यांनी केला.