महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या ग्र्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे भूषवणार आहेत.
पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, औरंगाबाद येथील ‘साकेत प्रकाशन’ने पुस्तकाची निर्मिती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या तीन-साडेतीन वर्षांच्या काळात भाजप कशा पद्धतीने कायमच प्रथम क्रमांकावर राहिला, याचे विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. फडणवीस सरकारच्या विविध योजना आणि निर्णयाचा सामान्य नागरिकांना, कुटुंबांना तसेच समुदायांना कसा फायदा झाला आणि त्यांचे जीवनमान कशा पद्धतीने सुधारले, या संदर्भातील यशोगाथांचा पुस्तकात समावेश आहे. राज्याच्या २०हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाच हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून, विविध समाजघटकांशी बोलून आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत या पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे.