नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून, समाजमनाला हादरवणारी आहे. अशा संवेदनशील प्रसंगी काही जण राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा घटनांमध्ये सर्वांनी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणं आणि त्यांच्यासोबत सहानुभूतीनं वागणं हे आपले कर्तव्य आहे. या घटनेचं राजकारण न करता केंद्र आणि राज्य सरकारला बळकटी देण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.
या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये नागपूर व अमरावती जिल्ह्यातील काही नागरिकांचा समावेश असून, त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आलेला आहे. त्यांना सुरक्षितपणे राज्यात आणण्यासाठी सरकारकडून तातडीची व्यवस्था केली जात आहे.
या हल्ल्यामध्ये विशिष्ट धर्म लक्षित करण्यात आल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणाले की, ही घटना केवळ दहशतवादी मानसिकतेचे दर्शन घडवणारी असून, देशाची एकात्मता खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व या घटनेतील पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
दरम्यान कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये स्थिरता आणि पर्यटन वाढीस लागले होते. हे पाहून दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे आणि त्यामुळेच त्यांनी अशा घटना घडवून आणल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. केंद्र सरकार अजूनही काश्मीरला शांततेचा प्रदेश बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.