मुंबई – राज्यात आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटात मुख्यमंत्रीपदावरून युतीच्या चर्चा सुरु झाल्या.
एकीकडे भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. मात्र यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील. कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असते की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात, असे फडणवीस म्हणाले.
कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाही, असे फडणवीस म्हणाले.