नागपूर: माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेले चार कलश गुरुवारी सकाळी मुंबईहून विमानाने नागपुरात आणण्यात आले. विदर्भात तीन दिवसीय अस्थिकलश यात्रा निघणार असून त्याची सुरुवात नागपुरातून होणार आहे.
अस्थिकलशाचे दर्शनासाठी आणि तो स्वीकारण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, शहर भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होते.
नागरिक व कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी अस्थिकलशाची यात्रा विमानतळाहूनच नागपूर ग्रामीणमध्ये जाणार आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार सकाळी १० वाजता बुटीबोरी, दुपारी १२ वाजता हिंगणा, १ वाजता वाडी, २.३० वाजता कोंढाळी, ४ वाजता नरखेड, ५.३० वाजता काटोल व सायंकाळी ७ वाजता कळमेश्वर होत रात्री ८ वाजता सावनेरला पोहचेल.
२४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावनेर येथून प्रस्थान केल्यानंतर ११ वाजता खापा, १ वाजता पारशिवनी, २ वाजता रामटेक, ३.३० वाजता मौदा, ५ वाजता कुही, सायंकाळी ६ वाजता उमरेड, ६.१५ वाजता नरसाळा होत नागपूरला पोहचणार आहे. ७.३० वाजता हुडकेश्वर रोड व रात्री ९ वाजता हा कलश मंगलम कार्यालय येथे शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येईल. २५ रोजी अस्थीकलय यात्रा शहरात फिरणार आहे.
दुपारी ४ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे अटलजींना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. २६ आॅगस्ट रोजी सकाळी अस्थिकलश यात्रा कामठीकडे जाणार असून येथील महादेव घाटावर सकाळी ९ वाजता या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती व प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
दुसरा अस्थिकलश २३ ला सकाळी ११ वाजता सेलूवरून निघून विविध भागाची यात्रा करीत २५ रोजी भंडारा येथे विसर्जित करण्यात येईल. तिसरा कलश तिवसा ते मोझरी व चौथा कलश मलकापूर ते खिरोडा अशी यात्रा करून विसर्जित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.