नागपूर : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनतर्फे रामेश्वरम् येथून देशभरातील विद्यार्थ्यांनी बनविलेले छोटे उपग्रह अंतराळात पाठविण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील दोन विद्यार्थिनींचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
स्वाती मिश्रा आणि काजल शर्मा असे विद्यार्थिनींचे नाव असून त्या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. ए.पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेतून बनविलले लहान उपग्रह अंतराळात एकाच वेळी पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी देशभरातून १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये नागपुरातून सदर दोन्ही विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. मनपाच्या शाळांत असूनही या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर यामध्ये स्थान मिळविले होते.
शाळेतील विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी त्यांना मार्गदर्शन केले. नुकत्याच रामेश्वरम् येथे ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या उपक्रमात दोन्ही विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. देशभरातील वैज्ञानिकांचे त्यांना यासाठी मार्गदर्शन लाभले. देशभरातील १००० विद्यार्थ्यांनी अंतराळात सोडलले १०० उपग्रह ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाउन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेईल व ती माहिती पृथ्वीला पाठविणार आहे. ‘फेम्टो’ या उपग्रहाचे वजन केवळ ५० ते ८० ग्रॅम असून ते अडीच ते ४ सेमीचे असेल. या उपग्रहाच्या निर्मिती संदर्भात दोन्ही विद्यार्थिनींनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह पाच रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि वस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य उपसभापती नागेश सहारे, नगरसेविका सुमेधा देशपांडे, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, विनय बगळे उपस्थित होते.
विपरित आणि हलाखीच्या परिस्थिती शिक्षण घेत असतानाही विज्ञानातून आपल्या आवडी-निवडी जोपासणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींनी केवळ नागपूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अशा विद्यार्थिनींनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी हवी ती मदत करावी, असे ना. नितीन गडकरी म्हणाले.