नागपूर: दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. पण यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष महत्त्वपूर्ण आहे. कलम ३७० रद्द झाल्यामुळे आपल्या स्वातंत्र्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले.
मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारत दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम सक्करदरा चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेता आणि खासदार सनी देओल यांची उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्व अखंड भारताची प्रतिज्ञा घेण्यासाठी एकत्र जमलोय. आजच्या कार्यक्रमाला विशेष आनंदाची पार्श्वभूमी आहे. कलम ३७० रद्द होण्यापूर्वी पाकिस्तानवाले काश्मीरात धुडगूस घालायचे. आज ती स्थिती नियंत्रणात आली आहे. काश्मीर आज शांत आहे. विशेष राज्याचा दर्जा समाप्त झाल्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. भविष्यात अखंड भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा.’
तत्पूर्वी, श्रीराम राज्य ढोल ताशा पथकातर्फे वादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदे मातरमचे गायन झाले. यामध्ये एकूण पन्नास शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे हंगामी शहराध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. विलास डांगरे, माजी आमदार मोहन मते, रमेश शिंगारे, ईश्वर धिरडे, किशोर कुमेरिया, छोटू वंदिले, कैलास चुटे आदी उपस्थित होते.