मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. महाविकास आघाडीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार’ ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’,अशा घोषणा देत सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारवर हल्लाबोल केला. तसेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सकारविरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर, जयश्री जाधव, बळवंत वानखेडे, संजय जगताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन अहिर,नरेंद्र दराडे,वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख सहभागी झाले होते.