नागपूर:काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान व लोकशाही संपवतील.तसेच देशात पुढे निवडणुकाच होणार नाहीत. त्यामुळे स्वत:च्या रक्षणासाठी यांना हद्दपार करा, असे टीकास्त्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
देशात संविधान लागू झाल्यानंतर गरीब, कामगार, मजूर, महिला सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. ब्रिटिशांच्या काळात फक्त श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार होता. आता मात्र सर्वांच्या मताचे महत्त्व सारखे आहे. मात्र भाजपच्या हुकूमशाही प्रणालीमुळे यावर गदा आली आहे.
खरगे यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. मोदींनी काळे धन परत आणले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. देशाची आर्थिक स्थिती सुधारली नाही. प्रत्येक गरिबाला घर मिळाले नाही.
युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. भाजप विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांच्यामागे ईडीच्या ससेमिरा लावला. मात्र भाजप पक्ष स्वतः२३ भ्रष्टांना घेऊन सत्तेत बसला, असा घणाघात खरगे यांनी केला.