नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीबीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन केला. मात्र या दोघांचेही फोन बंद आल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला धारेवर धरले.
आम्हाला शेतकऱ्यांवर राजकारण करायचे नाही. मात्र शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मी गाडीतून येत असतानाही मुख्यमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यांचा फोन बंद आहे. कृषीमंत्र्यांचाही फोन बंद आहे. शेतकऱ्यांना बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, त्यामळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात जात आहे. बियाणांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहायला हवं,असे पटोले म्हणाले.