मुंबई : विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे. याकरिता 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. भाजपकडून या निवडणुकीसाठी संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांच्या नावांची भाजपकडून घोषणा करण्यात आली.
शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध तर अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र नसल्याने अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती मिळत असून त्यामुळे आता विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळत आहे. 20 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असून 20 तारखेनंतर बिनविरोध संदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी करणार असल्याचे समोर येत आहे.