नागपूर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना कधीही वीज प्रवाह खंडित झाला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आले अन् भारनियमन सुरु झाले. महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या महत्त्वाच्या अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांत बिघाड झाल्याने पुणे व पिंपरी व चिंचवडमध्ये अंधार पसरला. साधारणतः २० लाखाहून अधिक नागरिकाना याचा फटका बसलाय. ही घटना पहाटे घडली त्यावेळी राज्यसरकार साखर झोपेत होते, असा प्रहार माजी ऊर्जा मंत्री व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आणि पुणेकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. ही घटना घडली त्यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्रालय झोपले होते. या परिसरात दाट धुके पसरले होते. दवबिंदूंमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात धुके प्रथमच पसरत आहे असे देखील नाही.
तर अशी घटना घडली तर काय करावे, कोणते पाऊल उचलावे याचे नियोजन ऊर्जा मंत्रालयाकडे तयार असणे गरजेचे असल्याचे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते, त्यावेळी ऊर्जा मंत्रालयाने केलेले लोकाभिमुख काम आज देखील पुणेकरांच्या लक्षात आहे. आज सारख्या घटना भाजपच्या कार्यकाळातही घडल्या. पण त्यावेळी पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था कुठून करावी याचा आराखडा तयार होता असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.