नागपूर : वैद्यकीय उपचार घेऊन घराकडे परत जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने एका भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता आठवा मैल चौकात झाला. रजनी सुभाष गिरनाळे (५०, रा.रत्नापूर, कापूसतळनी.
ता.अंजनगाव सूर्जी. जि. अमरावती), अक्षय गिरनाळे (२८) अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत. तर श्रद्धा गिरनाळे (२०) असे जखमी मुलीचे नाव आहे.
माहितीनुसार, गुरुवारी दीड वाजता वैद्यकीय उपचार घेऊन गिरनाळे कुटुंब परत जात होते. अक्षय हा कार चालवित होता. आठवा मैल चौकात अक्षयचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. कर धडकताच कार हवेत उडून दुसऱ्या मार्गावर गेली. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. त्यामुळे कार चक्काचूर झाली. कारमध्ये बसलेल्या रजनी आणि अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर श्रद्धा गंभीर जखमी झाली. वाडीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावार हे लगेच घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेची माहिती घेत जखमी श्रद्धा हिच्या जबाबानंतर पुढील तपास सुरु केला आहे.