नागपूर: दिल्लीचे तख्त भाजपाने काबीज केले. ही अतिशय आनंदाची घटना आहे. गेली २७ वर्षे भाजपा कार्यकर्ते आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत होते.या ऐतिहासिक विजयाबद्दल मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री मा. अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डाजी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो,अशी पोस्ट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे.
दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष वीरेंद्रभाई सचदेव यांच्या मेहनतीला, संघटन बांधणीला, टीमवर्कला यश आले.
‘दिल्ली के दिल में मोदी’हा नारा या निकालाने खरा करून दाखवला. दिल्लीच्या मनात कमळ आहे, हे आम्ही म्हणत होतो, ते सत्यात उतरविले,असेही बावनकुळे म्हणाले.
जनतेच्या पैशावर आपली घरे भरण्याचा नाद आम आदमी पार्टीच्या नेत्यांना लागला होता.आपच्या नेत्यांमध्ये भाजपा द्वेषाची चढाओढ होती. बोलण्यातून विखार उतरत होता. या द्वेषावर दिल्लीतील देशभक्त जनतेने रामबाण उपाय शोधला. आप सरकारची मद्याची नशा उतरविली.
‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, हेही आजच्या निकालाने दाखवून दिले. दिल्लीतील मराठी बहुल मतदारसंघात कमळ फुलले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्लीतील मराठी जनतेला सोबत येण्याची साद घातली. अनेक बैठकी, जाहीरसभा घेतल्या. घरोघरी प्रचार केला. त्याचा सकारात्मक परिणाम निकालातून दिसून आला आहे.
महाराष्ट्रातील यशामुळे सैरभैर झालेले राहुल गांधी आणि त्यांचे सख्खेसोबती उबाठा सेनेचे नेते कालच महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मताधिक्यावर मीठ चोळून गेले. मतांचे हिशोब मागत होते. मतदारांचा, लाडक्या बहिणींचा अपमान करत होते. आज दिल्लीतील जनतेने त्यांना ‘गेटआऊट ‘ म्हटले. एकही जागा काँग्रेस मिळवू शकले नाही. आता तरी, मतदारांच्या मतांचा आदर करण्याचे काँग्रेसने शिकावे. आरोप करण्याचे सोडून आता आत्मपरिक्षण केले पाहिजे.
दिल्लीच्या आजच्या विजयाची गुढी महाराष्ट्राच्या यशाने उंचावली आहे. निवडणूक रणात ज्यांनी मेहनत केली, त्या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो,असेही बावनकुळे म्हणाले.