विद्यार्थ्यांनी ‘पे बॅक टू सोसायटी’ हा मंत्र लक्षात ठेवून आपली कारकीर्द समाजाच्या उपयोगासाठी घडवावी- डॉ. नीलेश भरणे
विद्यार्थ्यांनी आपले धेय्य गाठताना महापुरुषयांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
नागपूर सामाजिक वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर
नागपूर : असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लाइज इंडिया (एपीईआय) संघटनेच्या नागपूर शाखेने होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम आज नागपूरातील महाराजबागस्थित कृषी महाविद्यालय येथे आयोजित केला होता. याप्रसंगी आयकर विभागाचे आयुक्त प्रदीप हेडाऊ हे मुख्य अतिथी म्हणून उत्तराखंड कॅडरचे पोलीस उपमहानिरिक्षक डॉ. नीलेश भरणे आणि कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. डी.एम. पंचभाई हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर सामाजिक वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर उपस्थित होते.
दहावी उत्तीर्ण झालेले तसेच हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी शिक्षण घेऊन करीयरची निवड करण्यासाठी अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा ,वैद्यकीय , व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांची निवड केली आहे अशा नागपूर जिल्ह्यातील 35 विद्यार्थ्यांना यावेळी शिष्यवृत्तीचा 6 हजार रुपयाचा धनादेश, वैचारिक पुस्तके तसेच प्रमाणपत्र मान्यवरांच्या देऊन सन्मानित करण्यातआले. शिष्यवृत्ती व्यतिरिक्त काही गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करण्याकरिता टॅब –स्मार्टफोन सुद्धा देण्यात आले.
प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजाप्रती संवेदनशीलता कायम ठेवून ‘पे बॅक टू सोसायटी’ हा मंत्र लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणे आपली कारकीर्द समाजाच्या उपयोगासाठी घडवावी असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक डॉ. नीलेश भरणे यांनी याप्रसंगी केलं.
स्वतः गरिबीतून शिक्षण घेऊन आयुक्त पदावर पोहोचलो तुम्ही सुद्धा मोठ्या पदावर पोहचू शकता, असे मत आयकर विभागाचे आयुक्त प्रदीप हेडाऊ यांनी मांडले.
विद्यार्थ्यांनी आपले धेय्य गाठताना महापुरुषयांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर सामाजिक वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले. पुढील काही दिवसात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्यात शिष्यवृत्ती वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले जातील जिथे कार्यक्रम घेणे शक्य नाही अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बँकेमार्फत ऑनलाईन दिल्या जातील, अशी माहिती डॉ. मानकर यांनी दिली.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केलं. कार्यक्रमाचे संचालन कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. तेलगोटे तसेच प्रांजली झोड यांनी केलं. प्रास्ताविक राजन तलमले यांनी केले. याप्रसंगी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे पालक आणि शिष्यवृत्तीला प्रायोजित करणारे सर्व अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंदना रायबोले, मोहन गजभिये, भावना वानखडे, कल्पना चिंचखेडे, शीतल सहारे, रिमोद खरोळे,महेंद्र ढवळे, मिलिंद देऊलकर, ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एपीईआय या संघटनेविषयी
एपीईआय या संघटनेच्या सध्या महाराष्ट्रामधल्या 21 जिल्ह्यात शाखा असून या संस्थेत सामाजिक बांधिलकी जोपासणा-या शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ,व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते समाविष्ट आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गरीब, होतकरू मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया (एपीईआय) ह्या संघटनेने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अखंडीत शिक्षणाला हातभार लाभण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरीता एपीईआयने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड व पश्चिम बंगाल राज्यात सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील गरीब व होतकरू अशा 180 पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले असून नुकतेच अमरावती येथे शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले आहे. एपीईआयने गठीत केलेल्या समिती मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रती विद्यार्थी 6 हजार रुपये याप्रमाणे मदत केली गेली आहे. ज्या होतकरु विद्यार्थ्यांचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे अश्या विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत प्राध्यान्य दिले गेले.