नागपूर: औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना नागपुरात सोमवारी (१७ मार्च) हिंसाचार भडकला. दोन गट आमनेसामने आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांवर दगडफेक केली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले. सार्वजनिक मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय मंत्री गडकरींसह मुख्यमंत्र्यांनी का दिली नाही भेट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहघर असलेल्या नागपुरात हिंसाचार घडला. दोन्ही नेत्यांनी नागरिकांना शांतात राखण्याचे आवाहन केले. मात्र या संपूर्ण हिंसाचाराच्या प्रकरणावर नितीन गडकरी यांच्या साधलेल्याकमालीच्या चुप्पीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे, गडकरी यांचे वडिलोपार्जित घर गडकरी वाडा महाल भागात आहे, जो दंगलीचा केंद्रबिंदू ठरला. दंगल झाल्यानंतरही फडणवीस आणि गडकरी दोघेही नागपुरात अनेक दिवस होते, पण त्यांनी दंगलग्रस्त भागात जाऊन नागरिकांचे सांत्वन करणे गरजेचे नव्हते का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संघाच्या औरंगजेबाच्या भूमिकेशी सहमत आल्याने गडकरींची चुप्पी का?
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी धार्मिक मजकूर असलेला कापड जाळल्याचा आरोप करत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याने शहरात मोठा हिंसाचार घडला. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपली भूमिका मांडली होती. औरंगजेबाचा मुद्दा आता कालबाह्य झाल्याचे संघाचे म्हणने आहे. ३०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला औरंगजेब आजच्या काळात प्रासंगिक नाही, असे संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले होते. संघाच्या या भूमिकेशी नितीन गडकरी सहमतच असतील. यामुळेच नागपुरात घडलेल्या हिंसाचाराला गडकरी यांनी गांभीर्याने बघितले नसावे, असे बोलले जात आहे.
नागपूरमधील घटनेत सरकारचा सहभाग,काँग्रेसने केला होता आरोप-
नागपूर हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, “जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या घटनेला पूर्वनियोजित म्हणत असतील, तर ते सरकार आणि पोलिसांचे अपयश आहे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे आहेत. जर ही घटना तिथे घडत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. त्यांचे एकमेव ध्येय महाराष्ट्र उद्ध्वस्त करणे आहे. नागपूरमधील घटनेत सरकारचा सहभाग होता. या आरोपानंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
गडकरी यांची जातीभेद आणि धर्माधारित राजकारणाच्या विरोधात कठोर भूमिका-
कुणालाही जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारे भेदभावाचा सामना करावा लागणार नाही, असे गडकरी म्हणाले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मी माझ्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड करणार नाही. मग स्वतःच्या मतदारसंघातील आणि आपल्या वाड्याच्या परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी स्वतः तिथे जाऊन लोकांना धीर का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनही नागपूरकरांची मोठी अपेक्षा-
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही नागपूरकरांची मोठी अपेक्षा होती. त्यांना दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा होता. नागरिकांना आश्वस्त करणे आणि तातडीच्या मदतीची घोषणा करणे हे त्यांच्या जबाबदारीत येत नाही का? अशा संकटाच्या काळात नेत्यांनी नागरिकांसोबत असावे लागते, पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागपूरकरांमध्ये मोठा भ्रमनिरास झाला आहे.