Published On : Fri, Dec 1st, 2023

नागपुरात ऑक्टोबर २०२३ पर्यंत दर दोन दिवसांनी ३ महिलांचा विनयभंग !

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर महिलांसाठी आधीच्या तुलनेत असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कारण शहरात दर दोन दिवसांत किमान तीन महिलांचा विनयभंग होत असल्याची माहिती ‘नागपूर टुडे’ने संकलित केलेल्या आकडेवारीतून समोर आली. यंदा ऑक्टोबर 2023 पर्यंत, नागपूर पोलिसांनी विनयभंगाच्या 445 गुन्ह्यांची नोंद केली असून शहरात दर दोन दिवसांनी किमान तीन महिलांचा विनयभंग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याव्यतिरिक्त, नागपूरमध्ये 226 बलात्कार आणि 244 कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्या. या आकडेवारीतून केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खूनांच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ –
नागपुरात 2022 मध्ये एकूण 65 खुनांच्या घटना घडल्या होत्या. तर 2023 मध्ये पहिल्या 10 महिन्यातच हा आकडा 69 पर्यंत पोहोचला. हे पाहता नागपुरात खुनाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.

Advertisement

प्रेम, अवैध संबंध आणि किरकोळ वादातून तब्बल 34 हत्या :-
धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये यापैकी 34 हत्या प्रेम, अवैध संबंध आणि किरकोळ वादातून झाल्या आहेत. नागपूर पोलिसांसाठी हे कठीण असून या घटना घडल्यानंतर पोलिसांना त्या कळतात. अशा घटना अनेकदा टाळता येत नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘नागपूर टुडे’ला दिली.

महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी – बलात्कारांच्या घटना: 226 (2023 ते ऑक्टोबर पर्यंत) , 250 (2022), 234 (2021), 172 (2020), 183 (2019)
विनयभंगाच्या घटना : 234 (2021), 250 (2022), 445 (2023 ते ऑक्टोबर पर्यंत) इतक्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

नागपुरात गुन्हेगारीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात तापणार –
एकंदरीत नागपुरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढता ग्राफ पाहता हिवाळी अधिवेशन तोंडावर आल्याने या घटनांमुळे नागपूर विधानसभेचे तापमान नक्कीच वाढणार आहे.

मागील वर्षाच्या प्रयत्नांना मागे टाकून नागपूर पोलीस महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज (MPDA) कायदा लागू करण्यापासून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) पर्यंत अनेक सक्रिय उपाययोजनांची अथक अंमलबजावणी करत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे, या प्रयत्नांना न जुमानता नागपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. यातच अल्पवयीन मुलींसह महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरलाय की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुभम नागदेवे