Published On : Mon, Mar 28th, 2022

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही डॉ. नितीन राऊतः

Advertisement

नागपूर, : राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी (ता.२९) दुपारी दोन वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू.

त्यामुळे संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.

Advertisement

ऊर्जामंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्यास मान्यता दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तर वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाला आमचा विरोध असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

त्यावर डॉ. नितीन राऊत म्हणाले, वीज कंपनी व्यवस्थापनाने दाखविलेल्या दिरंगाईबद्दल मी आपली क्षमा मागतो. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत.

त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.