नागपूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवार १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने मनपा मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सकाळी 7 वाजता शहरात ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तयारीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१४) आढावा घेतला.
मनपा आयुक्त सभाकक्षातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, डॉ. रंजना लाडे, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, अशोक गराटे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राउत, घनश्याम पंधरे, विकास रायबोले, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, धनंजय जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीचा सोहळा भव्यदिव्य आणि जनसहभागातून व्हावा या हेतूने केंद्र शासनाच्या श्रम एवं रोजगार व युवा कार्यक्रम एवं खेल मंत्री मा. डॉ. मनसुख मांडविया यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले आहे. यानुसार राज्यात सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारीला या पदयात्रेच्या सुरुवातीला सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करतील. मा. पंतप्रधान महोदयांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण नागपूर महानगरपालिकेद्वारे पदयात्रा ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. यानंतर ६ किमी पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात येईल.
या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. माय भारत पोर्टल मधून त्यांना स्वत: लॉगिन करुन प्रमाणपत्र प्राप्त करता येईल.