-मातृसेवा संघाच्या शतकपूर्ती महोत्सव पर्वाचे उद्घाटन
-कमलाताईंचे जीवनव्रती होत्या
-मानस ग्रूपतर्फे 11 लाख रुपये मदत
नागपूर: पर्यावरण रक्षण, प्रदूषणमुक्त शहरे आणि गावे, तसेच स्वच्छता यासाठी अधिक जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. यासोबतच समाजातील गरीब, दिव्यांग, अनाथ यांच्या उत्थानासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे अजूनही या व्यक्तींना सेवा मिळू शकत नाही. समाजातील मोठ्या संस्थांनी या कामासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, सडक परिवहन व सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मातृसेवा संघाच्या शतकपूर्ती महोत्सव पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणाताई बाबुळकर, सचिव डॉ. लता देशमुख, वासंती देशपांडे आदी उपस्थित होत्या. ना. गडकरी पुढे म्हणाले- लहान लहान गोष्टींमध्ये काम करण्याची गरज आहे पण लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली तर ही कामे करणे सोपे जावू शकते. प्रदूषणमु़क्त होण्यासाठी नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमधून डिझेल हद्दपार करण्याचा आपला प्रयत्न आहे. पाण्याचा पुनर्वापर आणि सौर विजेचा वापर यामुळे पर्यावरण चांगले राहून वीजबिलांचा खर्च कमी होणार आहे.
कमलाताई होस्पेट यांनी दलित पीडित शोषितांसाठी काम सुरु केले. या कामाला आर्थिक सहकार्य केले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- दिव्यांगांच्या शाळांमध्ये चालणारे प्रकल्प हे आधुनिक तंत्रज्ञानावर असले पाहिजे.
यासाठी मानस ग्रूप तर्फे गडकरींनी 11 लाख रुपये मदतीची घोषणा यावेळी केली. संस्थेने प्रशासकीय खर्च कमी करून स्वच्छतेवर अधिक भर देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणाताई बाभुळकर यांनी केले. संस्थेच्या कार्याची प्रगती सांगणार्या एका डिजिटल चित्रफीतीचे विमोचन आणि स्तन कर्करोग तपासणी केंद्राच्या नामफलकाचे विमोचनही ना. गडकरी यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले.