नागपूर: हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून विरोधकांनी आजही सत्ताधाऱ्यांना घेरले. ‘धारावी बचाव, अदाणी हटाव’ अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरआज निदर्शने केली. तसेच आमदारांनी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन केले.धारावीत प्रत्येक घरी लघुउद्योग चालतो. या परिसराचे पुनर्वसन झाल्यास लघुउद्योगांचेही मोठे नुकसान होणार आहे.
इतकेच नाही तर धारावीची मालकी अदाणींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात दानवे यांनी केला. तसेच वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.
विधानभवन परिसरात पायऱ्यांवर आजही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ खोके सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘ अदानीला सूट, धारावीची लूट, ‘ धारावी वाचवा, लघुउद्योग वाचवा’, ‘ अदानीला सुटली धारावीची हाव’ अशाही घोषणा विरोधकांनी दिल्या. या आंदोलनात दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड, वैभव नाईक, रवींद्र वायकर व इतर आमदार सहभागी झाले होते.