नागपूर: झोप ही एक अशी यंत्रणा आहे जी शरीर व मन या दोघांनाही विश्राम देणारी असते. पुरेशी झोप ही शरीर व मनाची एक मूलभूत गरज आहे. दिवसातील २४ तासातुन किमान ६ तास झोप शरीर व मेंदू उत्साही व तरतरीत होण्याकरीता आवश्यक आहे. त्यासाठी गाढ आणि शांत झोप लागणे हे सुद्धा महत्वाचे आहे.
चारकांनी निद्रेची व्याख्या सांगताना म्हंटले आहे की, यदां कालान्ते कार्मात्मान: काल्मानीत्वाता: l विषयेभ्यो निवर्ततः तदा स्वपिति मानव: ll
अर्थात – अशी अवस्था ज्यामधे इंद्रिय आपआपल्या विषयांपासून निवृत्त होतात व मन देखील पूर्णत: शिणल्याने आपले कार्य करण्यास असमर्थ होते. त्याच अवस्थेला निद्रा असे म्हणतात.
निद्रेच लाभ – यथाविधी घेतलेली झोप, शारीरिक व मानसिक पोषण करणारी, कर्मेन्द्रियांची कार्यक्षमता वाढविणारी, दीर्घायुष्य देणारी असते, याउलट अपुरी निद्रा ही दुखः, कृशता, दुर्बलता, नपुंसकता, अज्ञान तथा मृत्युकारक असते. त्याचमुळे आपल्या जीवनात झोप अतिशय महत्वपूर्ण असते. पण आज अनेकांना निद्रानाशाच्या व्याधीने ग्रासले आहे. जास्त चहा, कॉफीचे व्यसन, कामाचा व्याप, शारीरिक विकृती, मानसिक ताण – तणाव यांमुळे कित्येक लोकांना आनिद्रेचा त्रास होतो. आजच्या धावपळीच्या तसेच स्पर्धेच्या युगात आपली क्षमता व कौशल्य सिद्ध करण्यासाठी अनेकजण जास्त वेळ (ओव्हरटाईम ) काम करतात. त्यामुळे झोपेची वेळ निघून जाते पण काम मात्र संपता संपत नाही व वेळ गेल्यानंतर झोपायचे म्हंटले तर तास २ तास डोळा लागत नाही. अनेकांना तक्रार असते की, झोप लागते पण एकदा जाग आल्यास परत झोपच येत नाही किवा शांत झोप लागत नाही.
अपुऱ्या झोपेमुळे हृदयाघात, उच्चरक्तदाब, शुगर, किडनी विकार देखील होवू शकतात. रक्तासील इंटर क्युलीन ६ (आय. एल. ६), ट्युमर नेक्रोसीस हे तत्व, अल्फा (टी.एन.एफ.अल्फा) सी. रीऍक्टिव्ह प्रोटीन ( सी.आर.पी ) ही घातक द्रव्ये अपुऱ्या झोपेमुळे शरीरात वाढतात. ही द्रव्ये प्रमाणबाहेर वाढल्यास रक्ताची गुठळी होण्याची शक्यता ही ३ पटीने वाढते. ही गुठळी हृदयाच्या रक्तवाहीनीत अडकल्यास हृदयविकाराचा झटका (heart attack) येतो.
शरीरातील हार्मोन्सचे संतुलन ठेवण्याचे काम मेंदूमध्ये स्थित पिट्युटरी ग्रंथीचे असते, आणि मेंदूची कार्यक्षमता झोपेवर अवलंबून असते. घ्रेलिन नावाचे संप्रेरक (harmone) भूक व लेप्टीन हे संप्रेरक (harmone) क्षुधा शांतीसाठी (hunger control) जबाबदार असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात घ्रेलिन या हार्मोनचे प्रमाण वाढते तर लेप्टीन हार्मोनचे प्रमाण कमी होते. परिणामी आपल्याला जास्त भूक लागते व त्यामुळे स्थूलता येते. झोप ही शरीरातील इन्सुलिन या हार्मोनवर सुद्धा प्रभाव टाकते. इन्सुलिन हे शरीरातील शर्करेवर नियंत्रण ठवते. अपुऱ्या झोपेमुळे इन्सुलिन कमी स्रवते. परिणामी मधूमेहाची (डायबेटिस) व्याधी जडते.
परंतु पुरेशी व शांत झोप घेतल्यास आपली रोग–प्रतिकार क्षमता वाढते व विविध विकारांपासून संरक्षण होते. झोपेतच शरीरातील नवीन पेशी तयार होतात आणि शरीरात तयार होणारी अनेक घातक रसायने नष्ट केली जातात. एका संशोधनानुसार पुरेशी व योग्य झोप ही – निर्णयशमता ( decision making ), स्मरणशक्ती (grasping power) तसेच सर्जनशीलता (creativity) वाढविणारी असते. झोपेमुळे मेंदु आपले काम सुरळीत करतो. मेंदूच नाही तर शरीरातील सर्व इंद्रियांचा थकवा दूर होऊन सर्व इंद्रिये उत्साहाने कार्यरत होतात. शांत झोप ही मनुष्याला उत्पादनक्षम (productive) बनविते. जर झोप व्यवस्थित झाली नाही तर चिडचिड होते तसेच निराशा व ग्लानीमुळे कुठलेही कार्य व्यवस्थित होत नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या पोषणासाठी आहाराचे महत्व आहे, त्याचप्रमाणे यथायोग्य झोपदेखील शरीरस्वास्थ्याकरीता आवश्यक असते.
म्हणून म्हणतात ना – ” शांत निद्रा घ्या आणि स्वस्थ व उत्साही राहा.” (Sleep Well and Stay well…)
Visit for more details.