Published On : Wed, Apr 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर झालेत; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे गटावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे भाजपासह शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर झाले आहेत. तसेच मी पोराटोरांवर बोलत नाही, असेही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या कॅशचे गोडावून सापडले होते. तेव्हा आमच्यासोबत येता की आत टाकू अशी धमकी त्यांना दिली गेली होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर शिंदे म्हणाले,जनतेला विकासाच्या मुद्द्यांवर बोलायला आवडतं. सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरभैर झाले आहेत. वेडेपिसे झाले आहेत. त्यामुळे त्यांचं संतुलनपण बिघडलेलं आहे. बाकी पोराटोरांवर मी बोलत नाही. त्यांचे वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त काम केलेल्या लोकांकडून पाया पडून घेणं हे लोकांना आवडत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय होतं. लखनौमध्ये चतुर्वेदी यांची २०० एकर जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. त्याच्यासोबत कोण आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे.

Advertisement

लंडनमधील प्रॉपर्टी कुणाच्या आहेत, याची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण आम्ही एक मर्यादा पाळतो. राजकारणामध्ये राजकीय गणितं असतात, आरोप प्रत्यारोप असतात. मात्र वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे यांनी आम्हाला शिकवलेलं नाही. हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले, हे दुर्दैव आहे.मला त्यावर काही जास्त बोलायचे नाही आहे,अशा शब्दात शिंदे यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले.