नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणाव निर्माण झाला.ज्यामुळे महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाला. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी सकाळी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी निदर्शने केल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. नंतर संध्याकाळी दोन विरोधी गट एकमेकांसमोर आल्यानंतर हिंसक संघर्ष झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे.
शहरात दोन गटात झालेल्या भांडणात संतप्त जमावाने दगडफेक केली आणि अनेक वाहनांची तोडफोड केली. तणाव वाढताच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला.तसेच गर्दीला पांगवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.
जात-पंथ-धर्म या विषयावरून नागपुरात वाद नको- गडकरी
नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी केले आहे.
नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे गडकरी म्हणाले.
नागपूरकरांनो शांतता बाळगा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.