Published On : Fri, Jan 12th, 2024

महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी १४ जानेवारीला महायुतीचा संकल्प मेळावा

Advertisement

नागपूर : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. याकरिता महायुतीकडून १४ जानेवारी रोजी राज्यभरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठीचा संकल्प या मेळाव्यातून करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीने युद्धपातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुतीतील १२ घटक पक्ष एकत्र येत राज्यभरात जिल्हास्तरावर १४ जानेवारी रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. यामाध्यमातून महायुतीतील एकजुटतेचे प्रदर्शन करून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात येईल.

Advertisement

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना, आरपीआय(आठवले आणि कावाडे गट) आणि इतर घटकपक्ष सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी आणि एकाच दिवशी हा महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनाही दिली.
दरम्यान पत्रपरिषदेला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, प्रमोद पिपरे तसेच घटक पक्षातील इतर नेते उपस्थित होते.