वाडी : घरगुती वादातून पतीने पत्नीचा धारदार चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवनित नगर परिसरात शुक्रवार (७ एप्रिल) च्या सकाळी उघडकीस आली आहे. माधुरी मनोज सरोदे वय अंदाजे ४० वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती मनोज सरोदे वय ५० वर्ष यास वाडी पोलीसांनी अटक केल्याची माहिती आहे. आरोपीने शुक्रवारच्या पहाटे ५ वाजताच्या दरम्यान खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.
प्राप्त माहिती नुसार, आरोपी मनोज सरोदे व माधुरी यांच्यात नेहमी घरगुती वाद व्हायचा. या दोघांना एक १२ वर्षांचा मुलगा व एक १८ वर्षांची मुलगी आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी परिसरातील हे दाम्पत्य आहेत. गेल्या सहा महिन्यापासून हे दाम्पत्य दोन मुलांना घेऊन अमरावती रोड येथील नवनित नगर परिसरात राहत होते. गुरुवारच्या रात्री आरोपी मनोज सरोदे व मृतक माधुरी हे दोघेच घरी होते. मुलगा हा नातेवाईकाच्या इथे झोपायला गेला होता. तर मुलगी पोलीस भर्तीला गेली होती.
प्राथमिक माहिती नुसार दोघात चांगलाच वाद झालेला असावा आणि रागाच्या भरात आरोपी पती मनोज सरोदे याने पत्नी माधुरीचा धारदार चाकूने तोंडावर, पोटावर, डोक्यावर सपासप वार करुन तिचा खून केला असावा अशी प्राथमिक माहिती वाडी पोलीसांची आहे. आरोपी मनोज सरोदे हा एमआयडीसी येथे एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर आहे.
मृतक पत्नी माधुरी हि सुद्धा एका खाजगी कंपनी मध्ये होती. शुक्रवार (७ एप्रिल) रोजी सकाळी मृतक माधुरीचा मुलगा घरी आला. त्यावेळी त्याची आई त्याला मृताअवस्थेत आढळली. मुलाने आरडा ओरड करताच शेजार्यांनी धाव घेतली. लगेच घटने संदर्भात वाडी पोलीसांना कळविले. माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी पोहचले.
पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला. वाडी पोलीसांनी काही तासातच फरार आरोपी पती मनोज सरोदे याला आर्वी येथे अटक केली. घटने संदर्भात एसीपी प्रवीण तिजाडे, वाडीचे पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावर यांना विचारणा केली असता त्यांनी पुरेसी माहिती नसल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अनुराग जैन, एसीपी प्रवीण तीजाडे, वाड़ी पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर, एपीआय अचल कपूर, पीएसआय विजेंद्र नाचन, पीएसआय गणेश मुंडे उपस्थित होते.