नागपूर : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता या चित्रपटाच्या वादात राजकीय नेत्यांनीही उडी घेतली. विरोधकांकडून या चित्रपटाला विरोध होत असून भाजपने मात्र याला समर्थन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात कार्यकर्त्यांबरोबर जाऊन हा चित्रपट पाहिला. ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यावर फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली.
समाजात मुलींची दिशाभूल करून त्यांचे शोषण करण्याचे षडयंत्र केले जाते आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत पसरविण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले.
इतकेच नाही तर जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असे बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली असल्याचे म्हणत फडणवीस यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला.